Tuesday, 29 September 2020

माझी झाडं

    

                     माझी झाड........

मला झाड खूप आवडतात लहान, मोठी, बहरलेली, वाळलेली कशीही.मला त्यांच्याशी बोलायला आवडत. त्यांच्याकडे बघते तेव्हा ते ही एकमेकांशी बोलतात हे जाणवत. त्यांच्या पानांच्या हालचालीतून दिसतो त्यांचा संवाद कळतात त्यांच्या भावना !! आणि म्हणूनच आम्ही नवीन घर (flat)घेतलं तेंव्हा छोट्याशा गॅलरी त आधी कुंड्या ठेवायची सोय केली.मोगरा,जास्वंद, गुलाब,निशीगंध, कुंदा,शेवंती,पाम.अशी फुल देणारी आणि हिरवीशोभेची झाड नर्सरी तून आणून लावली.थोड्याच दिवसांत ही माझी झाड मस्त बाळसं धरू लागली.सकाळी उठल्या उठल्या मी आधी त्यांना बघून यायची. पाणी घालायचं आणि कोणाला कळी आली आहे का, कोणाला नवीन पान आलआहे का ,किड लागली आहे का?हे सगळं बघत त्यांच्याशी संवाद करत होते.त्यांना येणार्या नवीन कळ्या पाने बघून निसर्ग सृजनाच्या चमत्काराने आनंद व्हायचा, मस्त वाटायचं!!सगळी झाड मस्त बहरली.माझ्या कुंदाच्या झाडाला तर इतकी फुल येत की जणू चांदण्याच.हिरवा आणि पांढर्या रंगाने झाड अजूनच सुंदर दिसत होतं.

पण माझ्या या निसर्ग धनाला दृष्टच लागली .आमच्या सोसायटीने नोटीस काढली बाहेरच्या बाजूला स्टॅंड करुन ठेवलेल्या कुंड्या काढून घ्याव्यात.त्या आतल्या बाजूला ठेवाव्यात अथवा खाली आणून ठेवाव्यात.ते वाचून मला बैचेन व्हायला लागलं कारण घर लहान असल्याने गॅलरीत आतल्याबाजूने खूप सामान ठेवले होते. त्यामुळे आता आत ठेवणे शक्य नव्हते‌ आणि खाली ठेवल्यावर त्यांची होणारी परवड दिसत होती.कारण सगळ्यांच्याच कुंड्या खाली येणार होत्या. सारखं बैचेन होत होत. लवकर निर्णय नाही घेतला तर ५०००रुपयांचा दंड होणार होता.

पण माझ्या झाडांवरच्या प्रेमाने स्वामींनी सोय केली.माझ्या सासु सासर्यांना भेटण्यासाठी माझे दिर नगरहून गाडी घेऊन आले होते.मी त्यांना हे सगळे सांगितले तेंव्हा ते सगळ्या कुंड्या गाडीतून नेण्यास तयार झाले.त्यांचे बैठे घर असल्याने काही अडचण नव्हती आणि त्यांना स्वत:लाही झाडांची खूप आवड आहे .त्यांच्याकडे पण खूप झाडे आहेत.माझ्या झाडांना योग्य पालक मिळाला त्यामुळे मला खूपच आनंद झाला होता.

पण जेव्हा खरच सगळी झाड निघाली तेंव्हा मात्र मला रडायला च येत होतं.मी सारखी त्यांच्यावरन हात फिरवत होते त्यांना सांगत होते छान रहा तिथेही असेच बहरा, फुला...!मला सगळे घरातले हसत होते.बोलत नसले तरी ते माझे सखा सोबती होते आणि म्हणतातच ना माणसांच्या शेजारा पेक्षा झाडांचा बरा.!!

आजही माझ्या झाडांची रिकामी जागा बघून मला कसतरी होत.आणि वाटतं त्यांनाही माझी आठवण येत असेन का? त्यावर माझंच मन म्हणत नक्कीच येत असेन हात,पाय,शरीर नसले तरी त्यांनाही असतात ग संवेदना!!वार्याच्या लहरीं सोबत ते तुझी आठवण पाठवत असतीलच तेंव्हाच तर तूझ मन त्यांच्यासाठी इतक भावपूर्ण होतेस!!!!!


Monday, 14 September 2020

किराणामाल

                        

                         किराणामाल.....

परवा घरातला किराणा माल संपला म्हणून माझ्या मूलीने  माझ्या कडून मालाची यादी घेतली आणि भराभर मोबाईल वरून ऑनलाईन यादीतील सामान मागवले.दुस-या दिवशी घराच्या दारात सामान आले.क्षणभर वाटले बरं आहे ओझ उचलायचं कामच नाही आणि पायपीट पण नाही!


पण ते सामान काढून भरताना मला आठवण झाली ती माझ्या लहानपणीची ! किराणा दुकानाची. दुकानात जाऊन किराणा माल आणण्याची मज्जाच काही वेगळी होती.पगार झाला कि येणा-या रविवारी आमच्या कडे माल भरला जाई.मालाची यादी आई तयारच ठेवायची.आम्हा भावंडा पैकी एकजण कोणीतरी बाबांन सोबत जात असत. किराणा दुकानातील मालकाला आंम्ही भास्कर काका म्हणत असू.भास्कर काकांचे दुकान आम्हाला आमचेच वाटायचे परंतु घरातुन बाहेर पडताना च बाबांनी कशाला हात लावायचा नाही,अशी ताकीद दिलेली असे.दुकानात गेले कि बाबा भास्कर काकांच्या हातात यादी देत त्यावर एकदा नजर फिरवून ते गड्याकडे देवून माल भरण्यास सांगत.मग बाबांच्या आणि काकांच्या गप्पा रंगत.त्या ऐकण्यास मज्जा यायची.पण मला आवडायच ते मुनीम काका एक एक सामान सांगायचे आणि ते दुसरं कोणी तरी मोजून द्यायच.मग निघताना काकांन कडून एखादं चाॅकलेट(पारलेच किसमी) किंवा गोळी मिळायची. तेव्हा आनंद गगनात मावायचा नाही.

किराणा दुकानदार तेंव्हा परका नसायचाच.वर्षीनुवर्ष एकच दुकान ठरलेलं असायचं.घरातील अर्थिक अडचणी घरातल्यां पेक्षा त्यांनाच माहित असायच्या.पण त्याचा बोभाटा न करता वेळ सांभाळून न्यायचे.घरातील लग्न कार्य असो नाहीतर दु:खद प्रसंग किराणा मालाची कधी अडचण नसायची.अशा प्रसंगात कधी पैशाचा तगादा नसायचा.कारण गि-हाईकावर पूर्ण विश्र्वास होता आणि गि-हाईक ही त्या विश्वासास पात्र ठरत दोघांमध्ये सहज विश्वासाचे आपुलकीचे नेहमीचे नाते निर्माण होत असे.

आता ही तिचं माणसे आहेत गरजा ही त्याच आहेत पण ना आपुलकी आहे ना विश्वास.....आहे फक्त दुकानदार आणि गि-हाईक यांच्यातील व्यवहार!!!!!!


Thursday, 10 September 2020

संध्याकाळ....

 संध्याकाळ.......

       माझे घर पूर्व-पश्चिम असल्याने सू्र्योद्य पूर्ण नाही पण सूर्यास्त मात्र छान दिसतो.सध्याच्या परिस्थिती मुळे कंटाळा आला होता,मन ही अशांत होते.म्हणून गॅलरीत बसले  आणि सूर्यास्त बघत होते.पण तो बघत असताना मनात अनेक विचार गर्दी करत होते.क्षणाक्षणाला आकाशातले रंग बदलत होते.निरभ्र निळ्या रंगात राखाडी आणि केशरी रंगाची उधळण मनमोहक दिसत होती.ढगाच्या आड अस्ताला जाताना तो तेजस्वी गोल त्याच्या तेजाने आकाशाची आभा वाढवत होता!!!!

      क्षणात मनात विचार आला.माणसाचा अस्त ही असाच हवा. तो अस्ताला गेला तरी त्याच्या आठवणींच्या रंगाने सगळ्यांच्याच मनात त्याच्या आठवांची. चांगुलपणा ची सुंदर रांगोळी उठली पाहीजे.त्याच्या कतृत्वाची, प्रसन्नतेची आभा तो नसला तरी सगळ्यांच्या भोवती दाटून यायला हवी!!!

     असे झाले तर माणूस जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही!!!!😊😊😊😊

         सौ.प्राजक्ता देशपांडे😊

Saturday, 23 March 2019

सहजीवन

"नलु...ए नलु येतेस ना चहा प्यायला"? माधव काका नलु काकूंना बोलवत होते.गेली ७ वर्षे रोज सकाळी मला या गोड हाका ऐकू येतात.सुरुवातीला नवल वाटायचं पण आता सवय झाली.
      सात वर्षांपूर्वी नलु काकू आणि माधव काका आमच्या शेजारी रहायला आले.तेव्हा दोघेही साठीच्या पुढचे होते.सून आणि मुलगा अमेरिकेत स्थायिक झाला होता.मुलगीही परदेशातच होती.मोठ घर होतं पण दोघच काय करणार? म्हणून ते घर विकलं आणि इथे आमच्या शेजारी हा छोटासा 1 BHK फ्लॅट घेतला आणि बाकीची रक्कम बॅंकेत जमा केली होती.
      रोज सकाळी ६ ते ६:३० फिरून यायचं.आल्यावर काकू गॅलरीत जावून त्यांनी लावलेल्या झाडांना पाणी घालायच्या.तोपर्यंत काका चहा बनवायचे.नंतर रेडिओवरील गाणी आणि पेपर सोबत चहाचा आस्वाद घेत.मला त्यांचा हा परिपाठ नक्की माहित झाला होता.
      नवीन येणाऱ्या कोणालाही हे सगळं बघून किती सुखी , आनंदी आहेत असं वाटायचं पण त्यांच्या सुखाला ही दु:खाचं कोंदण होतच.
       माधव काका आणि नलु काकू दोघांनीही काटकसरीत सगळे अडथळे दूर करत संसार केला , मूल शिकवली पण मूलीने परदेशात शिकायला जावून तिकडेच लव्ह मॅरेज केले.आई - वडिलांचा फक्त आशीर्वाद मागितला... आणि सून इकडचीच ओळखीची असूनही तिला ह्यांची अडगळ वाटत होती. त्यामुळे मुलाने तिकडेच रहायचा निर्णय घेतला.पैसे पाठवायचा पण दोघेही स्वाभिमानी  त्यांनी स्वत‌:च स्वत:ची सोय केली.काकू खूप दुःखी झाल्या होत्या पण काकांनी त्यांना यातून बाहेर काढले.जो आपला तरूणपणातील सहवास राहीला आहे तो आता आपण पूर्ण करू.आनंदात राहू.असे सांगितले आणि खरंच माझ्या शेजारी आल्यापासून त्यांचे सहजीवन सुरू झाले.
       तरूणपणातील सहवास हा अपेक्षांचा , मोहाचा असतो , रूसव्या , फुगव्यांचा असतो पण हा सहवास निरपेक्ष असतो . त्याला मोहाचा सुगंध नसतो त्यामुळे तो आनंददायी ठरतो.त्या दोघांकडे बघून खरच मलाही खूप आनंद वाटायचा.दोघांनी स्वत:त दुसर्याला खरे पणाने सामावून घेतले होते.फूल आणि सुगंधासारखे झाले होते त्यांचे ! पूर्वीच्या राहिलेल्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्ण करून त्यात ते आनंद मिळवत होते.ज्यापासून त्रास होईल , दु:ख होईल त्यापासून शक्यतो दूर राहायचे तरीपण कधीतरी ती छटा दिसायची.त्यावेळेस किशोर आणि रफी यांच्या विशिष्ट गाण्याची धून त्यांच्या घरातून ऐकायला आली की मग मलाही हूरहूर लागायची आणि मी काकूंकडे काहीतरी निमित्त्य काढून जायची , त्यांच्याशी हलक्या-फुलक्या गप्पा मारायची.मग काकूंना ही बरं वाटायचं.
         खरच किती आनंदाने रहात होते दोघे! त्यांच्या आयुष्याला लागलेली दु:खाची किनार त्यांचं दुःख पुसु पहात होती.त्यांच्या सहजीवनाच्या झाडावरची फुल गळून पडली होती पण त्यांचं सहजीवनाच झाड अजून ही उमलू पहात होत ... एकमेकांच्या भरभक्कम आधाराने तजेलदार होऊ पहात होत.....
                           - प्राजश